मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

कविचा स्वर

स्मशानवासी देवदेवता
तिथले भूत-प्रेत-पिशाच्च
हाडे, कवट्या,
कोल्हे, कुत्रे, गिधाडे
धडाडत्या चिता
डोंब आणि चिंचेची झाडे
सारे कविभोवती
फेर धरून नाचत होते
कर्णकर्कश्श गीतांसह
वाद्यांच्या भयकारी गोंधळासह...
थोड्या थोड्या वेळानी
प्रत्येक जण
कविला प्रश्न करीत होता
विकट हास्यासह
`अरे कवडया,
तू कविता करतोस?
कुठे आहे तुझी कविता?'
प्रत्येकाचे विचारुन झाले
तरीही कवी शांत...
श्रांत झालेला तो समूह
क्षणभर थांबला
आणि संधी साधून
उच्च स्वरात कवी म्हणाला,
`ते पाहा...'
सारेच
त्याच्या बोटाच्या रोखाने
पाहू लागले
सळसळणार्या पिंपळाच्या फांद्यांमधून,
आणि कवी म्हणाला
`होय, मी कविता करतो
आणि करणारही
कारण
रात्रंदिवस धगधगणार्या
चितांच्या सान्नीध्यात राहूनही
स्मशानाच्या वर असणार्या
आभाळातही
पौर्णिमेचा चंद्र उगवतो
अन्
टिपुर चांदण्यांची शेती फुलते'
त्यानंतर फक्त
कविचा स्वर घुमत राहिला
बाकी सारे
शांत... शांत... शांत...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा