तू गाणी गातोस संध्याकाळची
रंगबिरंगी उदासीची
क्षितिजे भेदून जाणार्या नजरेनी
न्याहाळतोस तलम पापुद्रे
माणसांचे, विचारांचे, भावनांचे
या समग्र अस्तित्वाच्या कोलाहलाचे...
भयकंपित मनाने खोदतोस
विराट लेणी शब्दांची
अन् मुक्काम ठोकतोस
निबिड अरण्यातल्या
अलक्षित अंधारगुहेत
... ... ... ... आणि
विदीर्ण झालेले आम्हीही
घेतो, तुझ्या पदचिन्हांचा मागोवा
अनाम ओढीने,
अनसूय अजाण भाबडेपणाने
अंधाराच्या, अज्ञाताच्या
अनावर आसक्तीने
... ... ... ... म्हणुनच
थांबू नकोस
चालत राहा
जड झालेल्या अधीर पावलांनी,
आमच्या शापित अस्तित्वाला
करुणेचे दयार्द्र चंदनलेपन करण्यासाठी...
- श्रीपाद
१० मे २००९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा