संध्याकाळ झाली की,
उदास उजेड
चालून येतो माझ्यावर
आणि नि:शस्त्र, असहाय्य सैनिकाला
पराभूत केल्याच्या थाटात
निघून जातो पुढे
पुन्हा परतून येण्यासाठी...
त्याचे एकेक अस्त्रही जहाल असते
ब्रम्हास्त्रासारखे,
कधी असतो
शेतातून परतलेला बैल
गोठ्यात बांधलेला, एकटा
धपापणारा, तोंडातून फेस गाळणारा...
कधी असतो एक मुलगा
१०-१२ वर्षांचा
ज्याच्या डोळ्यात असतो संगम
अस्ताचलावरील सूर्याचा आणि
जन्मदात्या मातेच्या चितेचा...
कधी असतो थवा पक्ष्यांचा
आंब्याच्या, कडुलिंबाच्या, शेवग्याच्या
वा कुठल्याही झाडावरचा
ज्यांच्या कंठातून
कलकलाटाच्या रुपाने निघत असते
कालवाकालव अंतरातली...
किंवा कधी कधी
रेल्वेच्या प्रवासात
खिडकीतून पाहिलेली
बाया- माणसे- मुले
आपापल्या झोपडीच्या
दारात, अंगणात बसून
निरोपाचे हात हलवणारी
प्रवाशांकडे पाहून...
... तू देखील
अशाच संध्याकाळी
निघून गेली होतीस नं
मला,
उदास उजेडासोबत सोडून...
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा