शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

आलेख

मी उगाच भटकत होतो
वाळूच्या शांत समुद्री
मौनाला बिलगून गेली
मौनाची नाजुक गाणी

अवकाश मोकळे झाले
अंतरात गुदमरलेले
दु:खाच्या पाऊलखुणांनी
गालावर ओघळलेले

नभी चंद्र जरासा तुटका
वार्याने हालत नाही
शपथांच्या स्मरणधुळीने
आभाळ कोंदुनी जाई

हे असेच काहीबाही
फुलणार्या झाडाजैसे
गळणार्या पानांनाही
का टोचत असतील काटे?

गाण्याचे दु:ख सुकोमल
दु:खाचे गाणे भोळे
दूरस्थ चांदणीचेही
का भरून येती डोळे?

मातीचा स्पर्शच हळवा
वाळूत कसा गवसावा
भाळावर गोंदवलेला
आलेख कसा मिटवावा?

- श्रीपाद कोठे
रविवार, २५ डिसेंबर २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा