एक संदेश द्यायचा होता त्याला
म्हणून खेळला एक मोठ्ठा खेळ
घडवले महाभारत
सांगितली भगवद्गीता
अन दिला संदेश -
'उद्धरेत आत्मनात्मानं'
करायचा असतो उद्धार
स्वतःचा स्वतःला
आपणच असतो
आपले शत्रू
आपले मित्र
नसतो अवलंबून
आणि नसावंही;
पाहू नये तोंडाकडे कोणाच्या
शोधू नये आधार कुठे;
व्हावे स्वतःचे तारणहार...
आम्ही डोलावल्या माना
अन पाहू लागलो पुन्हा
याच्या त्याच्या तोंडाकडे;
त्याने केलेला प्रयोग
गिरवू लागलो आम्ही,
त्याने वापरलेली साधने
वापरू लागलो आम्ही,
त्याने दिलेले तर्क
देऊ लागलो आम्ही,
त्याने दिलेला संदेश मात्र
ठेवला गुंडाळून बासनात...
प्रत्येकाने व्हावे तारणहार
समस्त विश्वाचे
आपल्यासारखे
होते त्याचे स्वप्न;
त्यासाठीच होता संदेश त्याचा
आम्ही आपलेही तारणहार नाही होऊ शकलो...
पाहतोच आहोत अजून
याच्या त्याच्या तोंडाकडे
आशाळलेल्या नजरेने
अन ओरडतो आहोत
रस्त्यावर भटकणाऱ्या
दत्तात्रेयांच्या निष्ठावंतांच्या झुंडीसारखे...
अर्थहीन !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९
नागपूर
बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा