जखमी झालेला तो
निजला होता बिछान्यावर
तळमळत होता
वेदना आणि दु:खाने
कधी कण्हत, कधी ओरडत
आजूबाजूला असणाऱ्या कोणालाही
नव्हतं दुखत काहीही
नव्हत्या वेदना अजिबात;
त्यांनी केला मग एक ठराव
'आमच्यापैकी कोणालाही
दुखत नाहीय कुठेच
काहीच वेदनाही नाही,
आम्ही संख्येनेही आहोत अधिक
तू एकटा आहेस
अत्यल्प मतात आहेस
त्यामुळे तुला
दु:ख असूच शकत नाही
आम्ही फेटाळून लावतो आहोत
तुझा दु:खाचा प्रस्ताव
बहुमताने
अस्तित्वच नाही
तुझ्या दु:खाला
म्हणूनच गरज नाही
त्याकडे लक्ष देण्याची'
प्रस्ताव एकमताने पारित होऊन
ठराव झाला
सुरू झाली तयारी पांगण्याची
तेवढ्यात
कुणास ठाऊक कसे
पण एक जण बोलला -
'अरे विव्हळतोय तो
थोडे पाणी तरी देऊ या'
त्याला अर्ध्यात थांबवून
उत्तर मिळाले कडकडीत -
'काही गरज नाही
ज्याचं त्याचं सुखदु:ख
ज्याच्या त्याच्या जवळ,
प्रत्येक जण जबाबदार असतो
आपापल्या भोगासाठी,
त्याला दुखण्याचं स्वातंत्र्य
हवं असेल तर
आम्हाला नको का
त्याकडे दुर्लक्ष करण्याचं स्वातंत्र्य,
कण्हणं हा दुबळेपणा आहे,
दुखण्याचं प्रदर्शन अशोभनीय असतं,
सहअनुभूती वगैरे थोतांड आहे,
कोणी काही करण्याची गरज नाही,
उद्धरेत आत्मनात्मानं...
इत्यादी इत्यादी इत्यादी'
पाणी पाजण्याचा विचार करणारा
केविलवाणा होऊन गेला;
व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही
थुईथुई नाचत बाहेर पडल्या
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९
नागपूर
गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा