रविवार, ८ डिसेंबर, २०१३

किंकाळी

काळोखाला चिरून गेली
दर्दभरी किंकाळी
क्षणात झाली चैतन्याची
पाहा राखरांगोळी

गडद्द काळोखातून उठल्या
लवलवत्या ज्वाळा
घेऊन गेल्या आठ जीवांना
सोबत निजधामा

जुनेच होते वैर म्हणोनी
दिली लावूनी आग
चिल्लीपिल्ली होती झोपली
आली त्यांना जाग

काय करावे काही सुचेना
आगडोंब उसळला
चहू दिशांनी ज्वाळा ज्वाळा
दाखविती जिभल्या

तोंडून साधा शब्द फुटेना
देईल कैसी हाक
वाळून गेले अश्रू नयनी
दैवाचा हा खेळ

मायलेकरे बिलगून बसली
आला शेवटचा क्षण
काय बोलले असतील तेव्हा
कोण करी सांत्वन

उरली केवळ राख त्या स्थळी
जिथे होती झोपडी
आणि पलिकडे क्रौर्य गोठुनी
मान खाली घालुनी

अरे माणसा कैसी करणी
पशुपरी ही तुझी
यातून सुटका होईल का रे
देवा अमुची कधी?

- श्रीपाद
(सोलापूर जिल्ह्यात माढा येथे १५ फेब्रुवारी २०१० रोजी पारधी जमातीच्या २ स्त्रिया व ६ बालकांना त्यांच्याच जमातीच्या काही लोकांनी पूर्ववैमनस्यातून जाळून टाकले. त्या घटनेनंतर मनात उमटलेल्या भावना.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा