रविवार, ८ डिसेंबर, २०१३

राघववेळ

शरयूच्या तीरावर
अमनस्क, अपलक उर्मिला
सरत्या दिनकराकडे पाहत
राघववेळेच्या प्रतिक्षेत
लक्ष्मणाच्या शब्दांची शाल पांघरून... ... ...
अखेर फळास आली
१४ वर्षांची प्रतिक्षा
आणि शरयूचा संग सुटला... ... ...
युगे लोटलीत
तीरावर विसावणार्या प्रत्येकाला
शरयू उर्मिलेची कहाणी सांगते,
पण आज
मौन झाली शरयू
काय सांगू या पांथस्थाला
कशी उमेद बांधू याची
कोणत्या शब्दांनी?
कोणत्या कहाणीने?
कसा शांत करू याचा जीव?
ठाऊकच होते उर्मिलेला
अन् लक्ष्मणालाही,
प्रतिक्षा आहे, फक्त १४ वर्षांची
पण...
याची प्रतिक्षा?
किती काळ?
कोणत्या उर्मिलेसाठी?
याची राघववेळा कोणाला ठाऊक असेल?
मौनपणे शरयू वाहतेच आहे... ... ...

- श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा