किती बरं होतं ना
आम्ही राजकीय निरक्षर होतो !!
दूध रस्त्यावर फेकत नव्हतो;
कांदे, टमाटे खाण्यासाठीच वापरत होतो;
जाती माहिती होत्या तरी
कोणाच्याही काढत नव्हतो;
आमच्यासारख्या माणसांनाच
आमचे शत्रू समजत नव्हतो;
पाण्यासाठी, जमिनीसाठी
पदासाठी, खुर्चीसाठी
रोज रोज भांडत नव्हतो;
अपमानासाठी दबावासाठी
उखाळ्यापाखाळ्या करत नव्हतो;
शेजाऱ्याला शेजारी मानत होतो
माणसाला माणूस मानत होतो
उमदे मतभेद बाळगत होतो
पटणारे, न पटणारे
उघड, मोकळे बोलत होतो
असे सारे असूनही
आम्ही सारे एक होतो-
किती बरं होतं ना
आम्ही राजकीय निरक्षर होतो !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १६ जुलै २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा