कितीक लाटा आल्या गेल्या
कितीक पुसली गेली नावे
नाही विरला, नाही जिरला
एक किनारा तसाच आहे...
लाटा करिती दंगाधोपा
दंगाधोपा करिती माणसे
तरी स्तब्धसा आत्ममग्न तो
एक किनारा तसाच आहे...
महाल, किल्ले किती वाळूचे
उभे राहिले आणि विरले
पुन्हा एकदा त्या खेळास्तव
एक किनारा उभाच आहे...
पांथस्थांचा जमतो मेळा
जातो निघुनी वेळोवेळा
नव्या स्वागता नव्या उर्मिने
एक किनारा उभाच आहे...
कुठून आणतो अशी शांतता
येते कुठूनी ही अविचलता
प्रश्नांची ही रास ओतूनी
पुन्हा किनारा तसाच आहे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २० जुलै २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा