हरलास ना?
म्हटलं होतं-
नको लाऊस पैज, हरशील
पण तुला गर्व
खरं तर घमेंड
जगन्नियंता असल्याची...
केवढ्या ताठ्याने म्हणाला होता-
मला काहीही अशक्य नाही
मी काहीही करू शकतो
किती कोटी वर्षे झालीत
घालतोय जन्माला
प्रत्येक नवा क्षण वेगळा...
अन लागली पैज-
'अगदी पिळून टाकणारे स्वर
एकही थेंब उरणार नाही
असं गाणं ऐकवायचं
मी म्हणेन तेव्हा'
म्हणालास हो,
अन पूर्णही केलीस मागणी
काही दिवस !
आणि आता???
आता म्हणतोस- हरलो,
आता नाही शिल्लक
आतडी पिळणारा एकही स्वर
का? कुठे गेली तुझी
नवोन्मेषशालिनी प्रतिभा?
कुठे गेला तुझा ताठा
प्रत्येक क्षण
नव्याने जन्माला घालण्याची
फुशारकी मारणारा?
अजून तर केवढा उरलाय रस्ता
मला हवे आहेत स्वर
पेशी न पेशी पिळून काढणारे...
नपेक्षा
शरण ये
अन सोडून दे
पिळून घेण्यासाठी माझे मला...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २९ जून २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा