शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

कविता ग्रीष्माच्या

मोठं पटांगण
एका बाजूला प्रशस्त मंदिर
मध्यभागी जुन्या वटवृक्षाचा
विशाल पार
त्यावर विसावलेला मी
वडाच्या सावलीतही
भाजून काढणाऱ्या झळा
बचवासाठी कानाला रुमाल
पलीकडे पाण्याचा नळ
शेजारी भरलेला रांजण
गर्दी नसूनही
रांजणाजवळचा माणूस खंडत नाही;
मंदिराच्या सावलीत बसलेला तो
त्याने गाठोडी सोडली
त्यातून पेला काढला प्लॅस्टिकचा
दोनशे फूट चालत आला
रांजणापर्यंत, अनवाणीच
पेला भरून घेऊन गेला
न्याहारीसाठी;
त्याच्या भाळी सटवाईने
एकच ऋतू लिहिलाय - ग्रीष्म...
ग्रीष्माच्या झळा थोड्या शीतळ झाल्या असाव्या
पाच मिनिटांनी
रस्त्याला लागताना
कानाचा रुमाल
ग्रीष्माच्या झोळीत टाकून दिला
**************
ऐन जेवणवेळी
गोमाता हंबरते फाटकाजवळ
तिच्यापुढे पाण्याची बादली ठेवून
नजर जाते
रस्त्याच्या टोकाला असलेल्या
मंगल कार्यालयाकडे
जीवनाचे वसंत, ग्रीष्म
तरळून जातात नजरेपुढे
गोमातेपुढील बादली उचलताना
होतो साक्षात्कार
ग्रीष्माने ग्रीष्म झाल्याशिवाय
आषाढ, श्रावण बरसत नाहीत
**************
चला माझ्यासोबत
तुमची सुटका नाही
तुम्हाला पर्यायही नाही;
ग्रीष्माने बजावले
झाडावर उरलेल्या
काही चुकार पानांना
आणि आडोशाने बसलेल्या पाखरांनाही
ग्रीष्म ग्रीष्म आहे
**************
ग्रीष्म जळतो, जाळतो
भाजक्या ग्रीष्माच्या गंधाला
जग मोगरा म्हणतं...
*************
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २७ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा