सोमवार, १ जुलै, २०१९

खोटी कविता खरी होताना...

हे जग खूप सुंदर आहे,
हे जग खूप कुरूप आहे;
हे जग खूप चांगलं आहे,
हे जग खूप वाईट आहे;
हे जग म्हणजे स्वर्ग जणू,
हे जग म्हणजे निव्वळ नरक;
सगळी माणसं चांगलीच असतात,
माणूस चांगला असणं शक्यच नाही;
प्रयत्नाला काहीही असाध्य नाही,
प्रयत्नाने काहीच साध्य होत नाही;
जीवनात चढउतार येतच असतात,
जीवनात काहीही घडत नसतं;
प्रकाश हेच जीवनाचं वास्तव,
अंधार हेच वास्तविक जीवन;
षड्रिपु सुटता सुटत नाहीत,
ठरवलं की क्षणात षड्रिपु सुटतात;
जीवन म्हणजे मौजमजा करणे,
जीवन ही गांभीर्याने घेण्याची बाब;
जीवन म्हणजे निरर्थकता,
अर्थपूर्णता म्हणजेच जीवन;
काय खरं, काय खोटं?
चक्रव्यूह प्रश्नांचा...
***************
'तुझी कविता छान आहे
पण खोटी आहे...'
ज्येष्ठ कवीने सांगितले
नवोदित पुरस्कारप्राप्त कवीला...
'खरी करायला काय करू?'
नवोदिताने विचारले...
प्रत्येक ओळीच्या शेवटी
'कोणाकोणासाठी, कधीकधी'
एवढं फक्त जोड !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा