तो उठतो तेव्हा
संध्याकाळ असते,
तो कामे करतो तेव्हाही
संध्याकाळ असते,
तो जेवतो, फिरतो
वगैरे वगैरे तेव्हाही
संध्याकाळ असते,
तो झोपतो तेव्हा
संध्याकाळ असते,
झोपेत त्याला जाग येते तेव्हा
संध्याकाळ असते,
तो असल्याचं
त्याला आठवतं तेव्हापासून
संध्याकाळ आहे...
जीवनोदयाची उषा
जीवनास्ताची निशा
त्याने फक्त वाचलंय
तेही संध्याकाळी,
स्वच्छ दर्शन आणि अंधत्व
हेही ऐकलंय त्याने, तेही
झावर झावर संध्याकाळी,
हिवाळ्यात उशिरा उगवतो सूर्य
उन्हाळ्यात लवकर उगवतो सूर्य
पावसाळ्यात झाकलेला असतो सूर्य
हेही पडलंय कानावर त्याच्या
सूर्य चंद्र नसलेल्या संध्याकाळी,
त्याला फक्त ठाऊक आहे
संध्याकाळ...
अश्वत्थाम्याच्या
निरर्थक चिरंजीवीत्वासारखी...
- श्रीपाद कोठे
रविवार, १३ डिसेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा