शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

रियाझ

काय सांगता?
गाणी म्हणता तुम्ही?
वा वा, फारच छान
कुठली गाणी म्हणता?
मी म्हणतो गाणी-
मैत्रीची, प्रेमाची, मानवतेची
सत्याची, सेवेची, देवत्वाची
आभाळाची, वसुंधरेची, अज्ञाताची
शांतीची, प्रसन्नतेची, गुढतेची
एकत्वाची, अखंडतेची, अद्वैताची
आत्म्याच्या अंतरात्म्याची
अनंततेची अद्भूत गाणी...
अरे व्वा, छान, छान
बरं एक सांगाल?
हो हो, विचारा ना...
तुम्ही विकलंय कधी स्वत:ला?
कधी चिरून तुकडे तुकडे केलेत स्वत:चे?
अन टाकलेत ते
भुकेल्या लांडग्या, कोल्हया, गिधाडांपुढे?
कधी पाजलंय रक्त स्वत:च स्वत:चं काढून
कुत्र्यांना, मांजरांना?
कधी बोलावलंय वाघा सिंहांना जेवायला
अन स्वत:च स्वत:ला रांधून वाढलंय त्यांना?
कधी लाथाडून घेतलंय आपणच पाळलेल्या
गाढवांकडून, बैलांकडून, हत्तींकडून?
अहो, काय बोलताय तुम्ही हे?
काय म्हणता?
नाही केलं असं काही कधी?
म्हणजे तुम्ही रियाझ करीत नाही म्हणायचं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १८ फेब्रुवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा