मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

वाटांशी नातं जोडलं की-


मुक्कामाशी नातं तोडून
वाटांशी नातं जोडलं की
जाते पळून भितीबिती,
अवसेचा अंधारदेखील
शोधू लागतो वाट स्वत:ची,
विझलेले पथदिवेही होतात
वादळी समुद्रातील दीपगृह,
प्रत्येक पावलावर भेटते
अंतिम स्थानक प्रवासाचे,
कुठेच नसते पोहोचायचे
म्हणूनच नसते धावपळ,
अन नसते कासाविशीही
कुठे काही सुटून गेल्याची,
आनंदवाटांवरील अश्रुंचे थांबे
दु:खवाटांवरील हसुचे थांबे
वाकुल्या दाखवून खेळत असतात
वाटांच्या नातेवाईकांशी


- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ६ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा