विश्रांतीरत पावलाच्या अंगठ्याला
सुं सुं करत बाण लागला
प्राण वरखाली होऊ लागले
ज्यातून आलो त्या मृण्मयीच्या कुशीत
विसर्जित होण्याची क्रिया सुरु झाली
`एक सांगायचे- बोलायचे
राहून गेले आहे
सांगू तुला?'
मृण्मयी नाही म्हणाली...
तगमग वाढली
आशाळभूतपणे पाहिले
वाहत्या वाऱ्याकडे
तो थांबला क्षणभर
हाती मूक संमती घेऊन...
काय सांगू याला
उरलेल्या काही क्षणात?
`एक सल अंतरात रुतलाय जन्मभर
- कृष्णालाही हवी होती एक `कृष्णा'
- कृष्णाला `कृष्णा' मिळाली नाही कधीच
वाटत असे-
जे शहाणपण अर्जुनाला सांगितलं
ते ऐकणारी कुणी असावी,
वाटत असे-
दुरूनच माझं नागडेपण समजून घेऊन
ते झाकणारी कुणी असावी,
वाटत असे-
मी जसा निस्पृह होतो, तसे निस्पृहपण
धारण करणारी कुणी असावी,
वाटत असे-
माझ्यासाठी पारिजात आणणारीही
कुणी असावी,
वाटत असे-
मी ऐकतो साऱ्यांचे, तसेच माझेही
सारेकाही ऐकून घेणारी कुणी असावी,
वाटत असे-
माझ्याजवळ सगळ्यांना जाणवते
तशी निश्चिंतता जिच्याजवळ जाणवेल
अशी कुणी असावी,
वाटत असे-
हट्ट करता येईल अशी,
बरंवाईटपण विरवून टाकेल
अशी कुणी असावी,
वाटत असे- `कृष्णाला'-
आपल्यालाही एक `कृष्णा' असावी...
नाही मिळाली...
त्याने डोळे मिटले
तो मृण्मय झाला
वाऱ्याने शब्द झेलून घेतले...
तेव्हापासून वाहतोय वारा
कृष्णाचा सांगावा सांगण्यासाठी
कुणी `कृष्णा' भेटते का शोधत...
अश्वत्थ सळसळतो आहे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २५ मे २०१८
नागपूर
शुक्रवार, २५ मे २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा