पक्षी उठतात पहाटेच
अन गातात सुस्वर
ते फुलांच्या जन्माचे
आनंदगाणे असते,
पक्षी खेळतात दिवसभर
त्या फुलांच्या संगतीने
बागडतात त्यांच्यावर
मधही पितात त्यातला,
संध्याकाळी पुन्हा
गाऊ लागतात पक्षी
पण ते सुस्वर नसते
ते फुलांना वाहिलेल्या
श्रद्धांजलीचे गाणे असते,
सकाळी जन्मलेली फुले
संध्याकाळी माना टाकतात
संध्याकाळ फुलांच्या
अंत्यसंस्काराची वेळ असते
संध्याकाळ कासाविशीची
वेळ असते
संध्याकाळ पक्ष्यांच्या
विलापाची वेळ असते...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ एप्रिल २०१७
नागपूर
गुरुवार, १३ एप्रिल २०१७