आयुष्य चालत असतं
चालायलाच हवं,
दिवाळी येतच असते
यायलाच हवी,
उल्हास अन आनंदाने साजरी होते
व्हायलाच हवी,
सीमेवरच्या जवानांची आठवण येते
यायलाच हवी,
मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा चेहरा आठवतो
आठवायलाच हवा,
कष्टाने हातपाय ओढणारे डोळ्यापुढे येतात
यायलाच हवेत,
हृदयात एक कळ उठते
उठायलाच हवी,
डोळ्यात थेंब साचतो
साचायलाच हवा,
आनंदाच्या क्षणी
कशा कळ हवी?
आनंदाच्या क्षणी
का डोळा पाणी?
असं म्हणून त्यांना टाळू नका...
शत्रूच्या गोळ्या सोबत घेऊन
जगतात जवान,
उन पाउस सोबत घेऊन
जगतात किसान,
कष्टांची सोबत घेऊन
जगतात अनेक,
तुमच्या माझ्यासाठी...
तसंच, अगदी तसंच...
हृदयातली कळ
अन डोळ्यातला थेंब
सोबत घेऊन जगू या,
थोडं थोडं त्यांच्यासाठी,
कदाचित आपणच आपल्यासाठी...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा